राज्याच्या अत्यंत प्रभावी मुख्यमंत्र्यांनी जालना दौऱ्यात जालन्याची नवी ओळख विषद करतानाच मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू न देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यानही मुख्यमंत्री महोदयांनी जालना महानगराचा पाणीप्रश्न पूर्णतः सोडविण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, मोठ्यामोठ्या भाजप नेत्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही त्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडला असण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यामुळे जालनेकर मतदार-नागरिकांना फार काही फरक पडण्याची मुळीच शक्यता नाही. एक मात्र खरे की, मुख्यमंत्र्यांनीदेखील एकदाचा कसासा जालना जिल्ह्याचा दौरा उरकून टाकण्याचे एक कर्मकांड पार पाडले.
जालन्याचा लोखंड उद्योग दिवसेंदिवस वाढत असला, तरी त्या तुलनेत बी-बियाणे किंवा संकरित बियाणे उद्योगाची पूर्वीसारखी परिस्थिती आहे असे म्हणता येणार नाही. तर रेशीम उद्योग राज्य, देश किंवा जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न दाखविले जाऊ शकते. मात्र, या दौऱ्याने भाजपमधील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली मरगळ काहीशी झटकली गेल्या पलीकडे फार काही होऊ शकलेले नाही. नजीकच्या काळात कोणत्याही निवडणुका नाहीत आणि भाजप नेते-पदाधिकाऱ्यांकडेही सांगण्यासारखे काहीही नाही. पूर्वी निवडणुकांच्या तोंडावर सुरू केलेल्या 'लाडकी बहीण'सारख्या योजना बंद होणार नाहीत, हे वारंवार सांगतानाच युतीच्या नेत्यांची दमछाक पाहायला मिळते आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या ऐतिहासिक आणि तेवढ्याच निष्फळ दौऱ्याच्या निमित्ताने काही गोष्टी मात्र नको तेवढ्या प्रकर्षाने जाणवल्या आहेत. रेशीम उद्योगासाठी सुरू होणाऱ्या बाजारपेठेचे लोकार्पण हा कार्यक्रम पूर्णतः जालन्याच्या शिवसेना नेत्यांचा असल्याने त्याचे श्रेय... भाजपचे नवीन भव्य कार्यालय आता जालन्याच्या उद्योगनगरीतील अगदी पहिल्या फेजमध्ये उभारण्याची तयारी पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असतानाच, यापुढील काळात जालना जिल्ह्यात भाजपचा आणखी विस्तार होईल का, असा काहीसा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्याचे माजी खासदार आणि प्रभावी नेत्यांनी भाजपच्या गेल्या पन्नास वर्षांतील खडतर प्रवासाच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला, ते सर्वार्थाने बरेच झाले. स्वातंत्र्योत्तर काळासह आणीबाणीच्या कालावधीनंतरच्या त्या खडतर वाटचालीच्या अनुषंगाने माजी खासदारांनी त्या काळातील बिकट परिस्थिती आवर्जून सांगितली. त्याबरोबरच त्यांनी त्या काळातील पक्षाचे नेते प्रल्हादसिंग ठाकूर, पुंडलिक हरी दानवे, विठ्ठल अण्णा सपकाळ यांची मुद्दाम आठवण जागवली. एवढेच नाही तर, त्यांना नमन करीत असल्याचे नमूद करीत त्यांच्यामुळेच भाजपला चांगले दिवस आल्याचाही दावा केला.
मात्र, हे सांगताना माजी खासदार सोयीस्करपणे विसरले की, त्या (स्व.) पुंडलिक दानवेंना नाईलाजाने पक्षत्याग करावा लागला, त्यांच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरावा लागला आणि अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास, प्रल्हादसिंग ठाकूर यांच्या सुनेला अंबड पालिकेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक डावलून काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांचा विचार झाला. अशा पार्श्वभूमीवर गेली काही वर्षे जिल्ह्यात पक्षाची वाटचाल राहिल्यानेच लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला आणि पर्यायाने माजी खासदारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाने डावलेल्या निष्ठावंतांची जिल्ह्यातील यादी लांबलचक होऊ शकेल.
तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही माजी खासदारांची कारकीर्द फारशी दिलासादायक म्हणणे धाडसाचे ठरावे. तसे असते, तर जालना महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसच्या माजी आमदारांची मदत घ्यावी लागली नसती. तेव्हा....