वालसावंगी : कृषी विभागाच्या योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी 'आत्मा' योजनेंर्गत राज्यभरात ११ हजार ५८७ शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे. अनुभवी, प्रगतशील आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांना या उपक्रमात संधी मिळणार असून, एकूण निवडीपैकी ३० टक्के निवड महिलांची असणार आहे. वालसावंगी परिसरासह ग्रामीण भागातही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज आहे.प्रत्येक मंजूर सहायक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र निवडला जाईल. संबंधित सहायक कृषी अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र हेच शेतकरी मित्राचे कार्यक्षेत्र असेल. महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी तालुक्यातील एकूण गावांपैकी ३० टक्के गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना संधी व अटी:
शेतकरी मित्र होण्यासाठी उमेदवार संबंधित कार्यक्षेत्रातील गावाचा रहिवासी असणे आणि शेतकरी असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय २४ ते ६० वर्षे आणि शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असावी.
कृषी पदव्युत्तर, त्यानंतर पदवीधर, पदविकाधारक आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
समान शैक्षणिक पात्रता असल्यास अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड होईल. अंतिम निवड ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावाने पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे.
डिजिटल शेतीशाळांपर्यंत जबाबदारी:
शेतकरी मित्र गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देतील. शेतकरी गटांची निर्मिती, गटांची क्षमताबांधणी, शेतीशाळांसाठी लाभार्थी निवड, प्रशिक्षणांचे आयोजन आणि नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ग्रामसभेत सहभागी होऊन कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजनांची माहिती देणे आणि डिजिटल शेतीशाळांबाबत जनजागृती करणेही अपेक्षीत आहे.