जालनाः ब्राह्मण समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करणे काही गैर नाही. ज्या मागण्या निवेदन देऊनही सुटत नसतील तर आता उपोषण हाच पर्याय असल्याने मी अन्नत्याग उपोषण सुरू केले असल्याची भावना ब्राह्मण समाजाचे नेते तथा उपोषकर्ते दीपक रणनवरे यांनी सांगितले. रविवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता.त्यावर रणनवरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जालना शहरातील गांधी चमन येथे रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
ब्राह्मण समाज अल्पसंख्याक आहे. सहनशील आहे. म्हणजेच मागण्या करू नये अथवा आंदोलन करून नये असा होत नाही. मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार आहे. यापूर्वी दोन उपोषणे झाली. सरकार व शासन पातळीवर अनेक आश्वासने दिली गली. त्यापैकी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले. त्याबद्दल शासनाचे आभारच. पण महामंडळ स्थापन करून त्याचा उपयोग कधी होणार हा प्रश्न आहे. महामंडळ स्थापन झाले तरी अद्याप त्याची रचना ठरला नाही. कर्ज वाटप असो अथवा इतर लाभ याबाबत संदिग्धता आहे. यासह ब्राह्मण समाजावर होणारी टीका, व्यंग असो, मंदिरांचा प्रश्न असो, इनामी जमिनी तसेच पुरोहित वर्ग यासारखे असंख्य प्रश्न आहेत. यातील अनेक प्रश्न शासनाने मनावर घेतले तर ते सुटू शकतात. मात्र यावर ठोस अशी कारवाई होत नाही. हजारो वेळा निवेदने दिली. नेते मंडळींशी बैठका झाल्या. तेवढ्यापुरत्या आश्वासनानंतर कागदावरचा एकही प्रश्न सुटला नाही हे नक्कीच वेदनादायी म्हणावे लागत असल्याची खंत आंदोलक दीपक रणनवरे यांनी व्यक्त केली.
आर पार की लढाई
यावेळचे उपोषण काही तरी ठोस निर्णय झाल्याशिवाय सोडणा नसल्याचा इशारा दीपक रणनवरे यांनी दिला. शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. शासनाकडून जे प्रश्न तातडीने सुटू शकतात त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी दीपक रणनवरे यांनी केली. यामुळे यावेळची लढाई आर पारची असल्याचा इशारा दीपक रणनवरे यांनी दिला आहे.