जालना: महाराष्ट्र शासन, इतर बहुजन कल्याण विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आली. या प्रसंगी भटके विमुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आणि बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक अधिकारी श्रीमती अनिता राठोड उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी, "भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासकीय योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहू," असा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बी. वाय. कुलकर्णी व प्राध्यापक अंकुश चव्हाण यांनी उपस्थित राहून उपस्थितांना भटके विमुक्त चळवळ आणि शासकीय योजनांविषयी सखोल मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हा संयोजक व अशासकीय सदस्य (जालना समिती) . विकास गुलाबराव राठोड, सहसंयोजक विष्णू गिरी, अशासकीय सदस्य मुकेश भारद्वाज तसेच जालना शहर संयोजक अमोल आबासाहेब टाकसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.या सोहळ्यास बहुजन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अनंत कदम, बहिर, . सानप , चव्हाण यांच्यासह बहुजन समाज कल्याण विभागाचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.