जालना - आगामी श्री गणेश उत्सव आगमन व स्थापना-२०२६च्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासह कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री गणेश उत्सव आगमन स्थापना-२०२६ अनुषंगाने जालना शहरातील १४५ इसमांविरुद्ध मनाई आदेश.या अनुषंगाने डॉ. विक्रम साळी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, जालना यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३(२) अन्वये आदेश पारित केला आहे. सदर आदेशानुसार संबंधित इसमांच्या हालचाली व वर्तनावर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जालना पोलिसांनी स्पष्ट केले आहे. श्री गणेश उत्सव हा शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा उत्सव आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात, शांततेत आणि कायद्याचे पालन करून साजरा करावा, तसेच पोलिस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जालना पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.