जालना : मराठवाड्याच्या मुक्तीसाठी झालेल्या ऐतिहासिक संग्रामात जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. या लढ्यातील हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण आजही जालना जिल्ह्याच्या इतिहासात अभिमानाने केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढाण, माजी आमदार राजेश टोपे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलिस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मित्तल पुढे म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालना जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. परतूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाला या लढ्याच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. कोलते पिंपळगावकरांनी 22 जून 1948 रोजी रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा दिला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी जंगल सत्याग्रह ही झाले.
नागरिकांना शासनाच्या विविध सेवा, योजना, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या ‘जालना मित्र’ पोर्टलच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २ हजार ४६२ नागरिकांना घरपोच प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
प्रारंभी मान्यवरांनी टाऊन हॉल परिसरात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली.