शिष्टमंडळ फिरकेनाः मनोज जरांगे यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
प्रकृती ढासळली, शिष्टमंडळाच्या तारीख पे तारीख मुळे अनेकांची संतप्त भावना
Jalna Nayak 02-Sep-2026
Total Views |
जालनाः मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले असून आज पाचव्या दिवशीही शिष्टमंडळ फिरकले नसल्याने अंतरवालीसह अनेक जिल्ह्यातून यावरून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी शिष्टमंडळ येणार होते मात्र मंडळ आलेच नाही. पाच दिवसांपासून अन्नत्याग केल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. बुधवारी सकाळी संतप्त मराठा बांधवांनी धुळे- सोलापूर रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या.मंगळवारी रात्री शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र शासनाचा प्रस्ताव जरांगे यांनी फेटाळला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड व मंत्री उदय सांमत असलेले शिष्टमंडळ येणार अशी मंगळवारी दिवसभर चर्चा होती. प्रत्यक्षात एकही मंत्री उपोषणस्थळी फिरकला नाही.